Bolile je...Sanwad Elkunchwaranch
बोलिले जे...
संवाद एलकुंचवारांशी
अतुल देऊळगावकर
रियाज हा दोन-तीन प्रकारचा असतो. स्वत:ला सतत
निदान बौद्धिक पातळीवर वाढवत राहणं. स्वत:ला समृद्ध करणं,
त्यासाठी अनंत प्रवास करणं, अनंत वाचन करणं.
जे माहीत नाही तिथे शिरण्याचा प्रयत्न करणं. आणि ती आत्म्याची निकड म्हणून. तर हे जे आहे ते आवश्यक आहे. सर्व प्रकारचं त्याला कळलं पाहिजे.
त्यासाठी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. याला मी रियाज म्हणतो.
रियाज म्हणजे जगणं!
मला असं वाटलं की मी फक्त माध्यम आहे.
तो अनुभव येतो आणि म्हणतो की मी आता तुझ्या माध्यमातून
जरा व्यक्त होतोय. असं जर आहे तर तो अनुभव मोठाच आहे.
कुठल्याही अनुभवाचा आकार हा कॉस्मिकच असतो.
दंवबिंदूमध्ये आकाश दिसावं तसं ते आहे.
तेव्हा अनुभव एवढा भव्य जर असेल तर त्याच्यासमोर मी कोण आहे?
मी अत्यंत सामान्य, अत्यंत मिडिऑकर आयुष्य जगणारा माणूस.
तेव्हा मी फक्त माध्यम आहे. आणि आपण स्वत:ला धन्य समजलं पाहिजे की आपल्याला कुठल्यातरी त्या अनुभवानं निवडलंय वाहक म्हणून!
मी वाहक आहे. लेखकानं अदृश्यच व्हावं शक्यतो.
अनुभव हा जीवनाचा एक आविष्कार आहे.
आणि जीवन आपल्यापेक्षा फार मोठं असतं.
त्याच्यासमोर आपण नम्रच झालं पाहिजे.